चंद्रपुर :-जलनगर वार्डातील सावरकर नगरातील अतिक्रमण धारकांची घरे हटविण्याची कारवाई त्वरित थांबवावी यासाठी मी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेवुन त्यांना विनंती केली आहे. या संदर्भात नागरिकांनी कोणतीही चिंता करु नये. याप्रकरणी निश्चितपणे योग्य तोडगा आपण काढू अशी ग्वाही विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
दि. ०९ एप्रिल २०२२ रोजी जलनगर वार्डातील दुधडेअरी नजिकच्या सावरकर नगर परिसरातील अतिक्रमण धारकांची भेट घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, ज्या दिवशी नागरिकांनी अतिक्रमण केले. त्याचवेळी अधिका-यांनी येवुन ते हटविणे आवश्यक होते. मात्र ३०-४० वर्षे झाल्यानंतर नागरिकांनी परिश्रमाने बांधलेली घरे हटविण्याची जी कारवाई चालु आहे ती अन्यायकारक आहे. हा अन्याय आपण निश्चितच होवु देणार नाही असेही ते म्हणाले.
दुर्गापूर वार्ड क्र. ३ मधील अतिक्रमणाच्या प्रश्नाचे उदाहरण देत आ. मुनगंटीवार म्हणाले, ९०० च्या वर घरे १९८५ पासून अतिक्रमित जागेवर बांधण्यात आले होते. त्यामुळे केस कोर्टात गेली व शेवटी सुप्रिम कोर्टाने अतिक्रमण हटविण्याचा आदेश दिला. जिल्हाधिकारी अतिक्रमण हटविण्यासाठी आले असता मी त्यांना एक प्रश्न केला. ज्या दिवशी हे अतिक्रमण झाल त्या दिवशी तुम्ही कुठ होता. सुप्रिम कोर्टात पराभुत झाल्यामुळे हा प्रश्न सोडविणे फार अवघड होते. पण एक निर्धार करुन हा प्रश्न परिश्रमातुन मी सोडविला व ते अतिक्रमण कायमस्वरुपी नियमानुकूल झाले. तेव्हा नागरिकांच्या चेह-यावरचा आनंद बघण्यासारखा होता असेही आ. मुनगंटीवार म्हणाले. अतिक्रमण झाले त्याला ४० वर्षे झाल्यानंतर सुवर्ण महोत्सवी वर्षात नागरिकांना बेघर करुच शकत नाही. येत्या काही दिवसात या वार्डातील १०-१२ नागरिकांना घेवुन रेल्वे मंत्र्यांशी नवी दिल्लीत बैठक घेवुन या प्रकरणी निश्चितपणे योग्य प्रकारे तोडगा काढू असे आश्वासन आ. मुनगंटीवार यांनी नागरिकांना दिले. नविन रेल्वे पटरी टाकण्याची वेळ आलीच आणि त्यासाठी १०-१२ घरांना उठवावे लागले तर त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात येईल असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी उपमहापौर राहुल पावडे, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजयुमो महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर, नगरसेवक राहुल घोटेकर, राकेश बोमनवार, प्रमोद क्षिरसागर, महेश झिटे, बबन राऊत, अमित निरंजने, जुबेर शेख, अनिल वरघने, पिंटू यादव, श्री. चिंचोळकर आदिंची प्रमुख्याने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment