चंद्रपूर (प्रतिनिधी) : चंद्रपूर–दुर्गापूर परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (WCL) मार्फत सुरू असलेल्या ओव्हरबर्डन (OB) कामात गंभीर अनियमितता होत असल्याचा आरोप समोर आला आहे. हे काम KVRR कंपनीला देण्यात आले असून, कंपनीकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन, ओव्हरलोड वाहतूक आणि प्रदूषणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदन देत संबंधित कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. कंपनीकडून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माती वाहतूक करण्याचे काम सुरू असताना, निर्धारित क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेला जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
माहितीनुसार, संबंधित वाहनांची वहन क्षमता ४० ते ५० टन इतकी असताना प्रत्यक्षात ७० ते ८० टन मातीची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे वाहतूक नियमांचा भंग होत असून, रस्त्यांची दुरवस्था आणि अपघाताचा धोका वाढत आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे परिसरातील वरवट, चोरगाव आणि सिनाला तुकूम येथील शेतकऱ्यांच्या शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. धुळीच्या प्रदूषणामुळे पिकांचे नुकसान होत असून, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याची तक्रार आहे.
या प्रकरणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे ओव्हरलोड वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करून संबंधित वाहन जप्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कारवाई न केल्यास संबंधित कंपनीविरोधात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा विक्रांत सहारे यांनी दिला आहे.
या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, आता प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment