भद्रावती, जावेद शेख :
भद्रावती तालुक्यातील विंजासन येथील शेतकरी मधुकर खरवडे यांनी आपल्या शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या अर्जावर दीर्घकाळ कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा गंभीर आरोप करत प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मंडळ अधिकारी समीर वाटेकर तसेच नायब तहसीलदार मधुकर काळे यांनी अर्ज प्रलंबित ठेवून वारंवार पाठपुराव्यानंतरही तोडगा न काढल्याने मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
याशिवाय शेतात जाण्यासाठी अत्यावश्यक असलेला रस्ता उपलब्ध नसल्यामुळे शेती कामकाजावर परिणाम होत असून, अनेकदा अधिकाऱ्यांकडे धाव घेतल्यानंतरही केवळ आश्वासने मिळाल्याचे त्यांनी सांगितले. विविध पर्यायी मार्ग सुचविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात कोणताही मार्ग उपलब्ध करून न दिल्याने प्रश्न अधिकच चिघळल्याचे चित्र आहे.
या अन्यायाविरोधात अखेर मधुकर खरवडे यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांच्याकडे धाव घेत न्यायाची मागणी केली. संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण आता न्यायप्रविष्ट झाले असून प्रशासनाला कायदेशीर चौकटीत उत्तर द्यावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
या संदर्भात तहसीलदार राजेश भांडारकर यांनी स्पष्ट भूमिका घेत, “तुम्हाला निश्चितच न्याय मिळेल; मात्र कायदा हातात घेऊ नका,” असे सांगत शेतकऱ्याला संयम राखण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, मधुकर खरवडे यांनी आवश्यक नोंदणीकृत कागदपत्रे सादर केली असून, पावसाळा तोंडावर असताना तातडीने पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. रस्ता नसल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात शेतरस्त्यांच्या प्रश्नांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट आणि कडक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्ता मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, रस्ते अडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
तरीही, विंजासन येथील या प्रकरणात स्थानिक पातळीवर विलंब होत असल्याने शेतकऱ्याला न्यायासाठी न्यायालयाची दारं ठोठवावी लागल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आता या प्रकरणात प्रशासन तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्याला दिलासा देणार का, की हा प्रश्न आणखी लांबणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment