भद्रावती तालुका प्रतिनिधी- दिनांक ६ मे रोजी दुपारी कोकेवाडा येथील पंकज गणपत मानकर यांचा मोबाईल चंदनखेडा येथील आशिष इलेक्ट्रिकल्स येथे कामानिमित्त येत असताना नकळत रस्त्यात खिशातून पडला. ते पेट्रोल पंपावर पोहोचल्यावर मोबाईल घरी विसरल्याचे वाटले, मात्र घरी जाऊन पाहणी केली असता मोबाईल सापडला नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा रस्त्यावर शोध घेतला, तरीही मोबाईल मिळाला नाही.
यानंतर पंकज मानकर यांनी चंदनखेडा येथील आशिष इलेक्ट्रिकल्सचे संचालक आशिष हनवते यांच्याकडे धाव घेत संपूर्ण हकीकत सांगितली. आशिष हनवते यांनी तत्काळ मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता वायगाव (तु) येथील सुचिता एकनाथ शेंन्डे यांनी फोन उचलून प्रामाणिकपणे माहिती दिली की, त्यांना रस्त्यावर मोबाईल सापडला असून ते सध्या चंद्रपूर येथे लग्नसमारंभासाठी जात आहेत. त्यांनी आपला पत्ता व नाव सांगून परत आल्यानंतर मोबाईल देण्याचे आश्वासन दिले.
यानुसार, परत आल्यानंतर सुचिता शेंन्डे यांनी स्वतः संपर्क साधून पंकज मानकर यांना बोलावले व मोबाईलसह कव्हरमध्ये असलेले ५०० रुपयेही सुरक्षित परत केले. या प्रामाणिक कृतीमुळे समाजात एक सकारात्मक संदेश गेला आहे.
या वेळी पंकज मानकर (कोकेवाडा), सुचिता एकनाथ शेंन्डे, गणेश नन्नावरे (वायगाव), तसेच चंदनखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर दडमल व आशिष हनवते उपस्थित होते.
👉 सुचिता शेंन्डे यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 comments:
Post a Comment