राजुरा, दि.३० जून
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ, राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल, राजुरा येथे शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पाठ्यपुस्तक वितरण आणि पर्यावरण जनजागृतीचा अनोखा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आलेली ‘ज्ञानाची जंगल सफर’ ही संकल्पना कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच पर्यावरणाबद्दल प्रेम, निसर्गाशी आत्मीय नाते आणि जैवविविधतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शालेय परिसरात ‘ज्ञानाची जंगल सफर’ साकारण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षसंवर्धन, वृक्षारोपण, पशू-पक्ष्यांचे संरक्षण, जैवविविधतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. बालवयापासूनच पर्यावरणपूरक जीवनशैलीची सवय लागावी आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची भावना विकसित व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांनी पुढाकार घेऊन शालेय परिसरात ही अभिनव ‘ज्ञानाची जंगल सफर’ उभारली. आकर्षक माहितीफलक, विविध वृक्षांची माहिती, पर्यावरणपूरक संदेश आणि शैक्षणिक मांडणीमुळे विद्यार्थी, पालक आणि उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश धोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष मनोहरराव साबनानी, सचिव भास्करराव येसेकर, संचालक मधुकर जाणवे, अविनाश निवलकर, राकेश बोधे, आगार व्यवस्थापक राजुरा, वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार, वैभव धाडसे, मुख्य कारागीर मनोज कोल्हापुरे, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर, पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राजुरा तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण विद्यार्थिनी त्रेमासिक शंभर टक्के सवलतीचा मोफत पास वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करताना शिक्षणासोबत पर्यावरण संरक्षणाची शपथही घेतली. या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना एक नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती कल्लुरवार यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी तर आभार सुनीता कोरडे यांनी मानले.
0 comments:
Post a Comment