चंद्रपूर : अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम कार्यारंभ आदेशानुसार दोन वर्षात पूर्ण करायचे होते. मात्र साडेचार वर्षाचा कालावधी होऊनही काम अपूर्णच आहे. या योजनेसाठी खोदकाम केल्याने डागडूजी अद्यापही केली नाही. परिणामी शहरातील नागरिकांना खड्ड्यांच्या व धुळीच्या त्रासाला समोर जावे लागत आहे. असे असतानाही, मनपाने कंत्राटदाराला २०० कोटी रुपयांची देयके देण्याची लगीनघाई केली. शहरातील चार लाख नागरिकांना एप्रिल फुल बनविले, असा आरोप करीत मनपा सत्ताधाऱ्यांविरोधात १ एप्रिलपासून गांधी चौकात मनपासमोर धिक्कार आंदोलन करण्याचा इशारा जनविकास सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
चंद्रपूर मनपाने सन २०१७ मध्ये केंद्र सरकार पुरस्कृत अमृत पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश दिला. त्यानुसार दोन वर्षाच्या आत म्हणजेच २०१९ पर्यंत या योजनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र साडेचार वर्षाचा कालावधी लोटूनही या योजनेचे काम अपूर्णच आहे. याऊलट साडेचार वर्षाच्या कालावधीत जागोजागी रस्ते खोदले आहेत. खोदलेल्या रस्त्यांची डागडूजी केली नसल्याने शहरातील नागरिकांना विविध त्रासाला सामोर जावे लागत असून आरोग्याच्या समस्या भेळसावत आहेत. अमृत योजनेच्या कंत्राटदारासोबत सत्ताधारी पक्षाचे नेत्यांच्या लागेबांधे असल्यामुळे अमृत योजनेला विलंब होऊनही कंत्राटदाराचा बचाव करण्यात येत आहे. अत्यंत धीम्या गतीने काम करणाऱ्या या कंत्राटदाराला देयके देताना मात्र जलदगतीने कार्यवाही करण्यात येत आहे. कंत्राटदारांना २०० कोटी रुपयांची देयके देण्याची लगीनघाई महानगरपालिकेने केलेली असल्याने १ एप्रिलपासून धिक्कार आंदोलन करण्यात येणार असल्याचे नगरसेवक पप्पु देशमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ
मे. संतोष एजन्सी या कंत्राटदाराने अमृत योजना पूर्ण करण्यास तीन वर्षापेक्षा जास्त विलंब लावला. कोरोना आपत्ती सुरू होण्याच्या एक वर्षापूर्वी अमृत योजनेचे काम होणे अपेक्षित होते. मात्र विलंब झाल्यानंतरही कंत्राटदाराला अभय देण्यात आले. यानंतर कोरोना आपत्तीचे कारण पुढे करून एकवेळा मुदतवाढ देण्यात आली. कोरोना नियम शिथिल झाल्यावर कोणतेही कारण नसताना कंत्राटदाराला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. तीन वर्षे विलंब होऊनही कंत्राटदार विरुद्ध महानगरपालिकेने कोणतीही कारवाई केली नाही.
श्रेय लाटण्यात व्यस्त
मागील सात दिवसांपासून शहरात पाणीपुरवठा बंद आहे. इरई धरणाकडे पाईपलाईनची दुरुस्ती योग्य प्रकारे केली नाही. त्यामुळे सतत दोन वेळा पाईपलाईन डॅमेज झाली. याबाबत नगरसेवक व अधिकाऱ्यांची साधी बैठक घेतली नाही. मनपा अधिकारी व सत्ताधारी 'पाण्या' पेक्षा 'खाण्या' च्या बाबतीत जास्त गंभीर आहेत. एकीकडे मार्च एंडिंगमुळे कंत्राटदारांची देयके मंजूर करण्यात अधिकारी गुंतले असताना सत्ताधारी मात्र आजाद बगीच्याचे श्रेय घेण्यात गुंतले होते. त्यामुळे भर उन्हाळ्यात शहरातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल झाले, असा आरोपही पप्पु देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
0 comments:
Post a Comment