भद्रावती तालुका प्रतिनिधी :-भद्रावती तालुक्यातील कोंढा फाटा ते अरबिंदो रियल इनफ्रास्ट्रक्चर कंपनीपर्यंत जाणाऱ्या पांदन रस्त्यावरून गेल्या कित्येक दिवसांपासून कंपनीची अवजड वाहने येत जात असल्यामुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्याची झळ या शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अरविंदो कंपनीची जड वाहतूक थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी या परिसरातील प्रभावीत शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे कंपनी प्रशासनाकडे केली आहे.
Damage to crops in the area due to heavy vehicles of Aurobindo Company.
या पांदन रस्त्यावरून अलीकडे अरविंदो कंपनीची जड वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हा पांदण रस्ता अरुंद असल्यामुळे व या रस्त्यावरून कंपनीची जड वाहने वरचेवर ये जा करीत असल्यामुळे रस्त्यालगतच्या शेतातील सोयाबीन, कापूस, तूर तथा इतर पिके धुळीमुळे प्रभावित झालेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. ही वाहतूक बंद करावी यासाठी सदर शेतकऱ्यांकडून कंपनीकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या, मात्र कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे प्रभावीत शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे जड वाहतूक बंद करण्याची मागणी कंपनीकडे केली आहे. हि वाहतूक बंद न केल्यास शेतकऱ्यांतर्फे या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन सादर करताना खेमचंद हरियाणी, कवीश्वर शेंडे, संदीप वालदे, बंडू रामटेके, सय्यद मुस्ताक अली, दीपक हरियाणी, रवींद्र शिंदे, बबन काकडे तथा अन्य शेतकरी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment