अकोला : श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या कार्याची दखल घेऊन श्री संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावतीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष ह भ प वासुदेवराव महल्ले यांचा शाल श्रीफळ सनमानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सत्कार सन्मान गौरव करण्यात आला . या सत्काराला उत्तर देताना ह भ प वासुदेवराव महल्ले पाटील म्हणाले की महाराष्ट्राला लाभलेली संतांची उज्वल परंपरा ही महान असून त्यातील संतद्वय श्री संत गाडगे महाराज व श्री संत वासुदेव महाराज यांचे कार्य सर्व समाजाला प्रेरणादायी असल्याचे मत श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्री क्षेत्र श्रद्धासागर, आकोटचे अध्यक्ष श्री.ह.भ.प. वासुदेवराव महाराज महल्ले यांनी व्यक्त केले.
स्थानिक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे आयोजित गरजूंना वस्त्रदान व सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, श्री संत वासुदेव महाराज उपाध्य श्री ज्ञानेश्वरदास यांनी लिहिलेल्या श्री संत गाडगेबाबा चरित्रामधील १९ व्या अध्यानुसार सेवाग्राम येथे तत्कालीन मंत्री बाबासाहेब खेर यांनी महात्मा गांधीजी व संत गाडगेबाबा यांच्या भेटीचा योग घडवून आणला. या ठिकाणी संत गाडगेबाबांचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | या अभंगावरील कीर्तन ऐकून महात्मा गांधींना वाटलेले आश्चर्य, तसेच कर्मवीर भाऊराव पाटलांना शासनाकडून अनुदान मिळण्याकरता संत गाडगेबाबांनी केलेले अथक प्रयत्न या दोन प्रसंगांना त्यांनी उजाळा दिला. त्याचबरोबर तीस-पस्तीस वर्षांपूर्वी याच संत गाडगेबाबांच्या अमरावती विद्यापीठामध्ये श्री संत वासुदेव महाराजांचा भव्य उद्बोधन कार्यक्रम पार पडला. या आठवणींना श्री महल्ले महाराजांनी प्रामुख्याने उजाळा दिला.
संत गाडगेबाबांचे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य, समाज प्रबोधन श्री संत वासुदेव महाराजांनी सुद्धा प्रयत्नपूर्वक केले. याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,
नायम् जनोमे सुखदुःख हेतुर् | हा श्रीमद् भागवताचा श्लोक सांगून श्री संत वासुदेव महाराज यांनी ग्रहांचा मानवी जीवनाशी काहीही संबंध नाही. त्यांची भीती बाळगू नका. मनमुहूर्त सर्वात श्रेष्ठ आहे. ग्रहांचा जप, पूजा करून न निघणारे लग्न जर निघते, तर त्याच ग्रहांचा जप करून भाजलेली ज्वारी का उगवत नाही ? अशा प्रकारचा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे चांदणी बुडी, पौष महिना, आदी अंधश्रद्धा मुळीच पाहू नका, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले. या अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्याकरताच गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराजांनी सन १९३९ मध्ये बालसंस्कार शिबिरांना सुरुवात केली. या बालसंस्कार शिबिरांचे श्री महाराज आद्य जनक आहेत. या शिबिरांचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रासह भारतभर होत आहे. याप्रमाणेच श्री महाराजांनी ३७ ग्रंथाद्वारे संतांचा खरा इतिहास जनतेसमोर मांडला आणि हे सर्व ग्रंथ लाखो रुपये स्वतः खर्च करून जनताजनार्दनाला विनामूल्य वितरित केले. या घटनेची दखल घेऊन इंग्लंडच्या इंटरनॅशनल बायोग्राफिकल सेंटर, केंब्रिज यांनी श्री महाराजांना "२१ व्या शतकातील थोर द्रष्टा" म्हणून गौरवान्वीत सुद्धा केले आहे. श्री महाराजांच्या ग्रंथांची प्रसिद्धी नेपाळ, इंग्लंड, रशिया, अमेरिका, आदींपर्यंत पोहोचली आहे. यानंतर श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, अमरावतीचे अध्यक्ष डॉ. अनिल सावरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. समारंभात गरजूंना वस्त्रदान सोहळा संपन्न झाला. अध्यक्षीय भाषणातून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी आपले विचार व्यक्त करताना अकोल्याचे वासुदेवराव महाराज महल्ले, सुखदेवजी भुतडा हे दोन्ही समाजाकरता प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे विचार व्यक्त केले. समाजामध्ये विविध प्रकारे जनतेची सेवा करीत असल्याबद्दल श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, आकोटचे अध्यक्ष श्री ह भ प वासुदेवराव महाराज महल्ले यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिलीप काळे, अतिथी परिचय इंजि. बाळकृष्ण आमले यांनी सादर केला. याप्रसंगी प्रकुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भैय्यासाहेब मेटकर, कुलसचिव डॉ. अविनाश असणारे, सुखदेवजी भुतडा, सौ सुनंदाताई आमले यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. अशी माहिती समाजसेवक वारकरी गजानन हरणे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवली आहे.
0 comments:
Post a Comment