चंद्रपुर :-रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती च्या आवाहनानंतर आज गुरुवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 वाजता शेकडो नागरिक,खेळाडू तसेच पोलीस व सैन्य भरतीसाठी सराव करणारे युवक यांनी एकत्रित येऊन कंत्राटदराने मैदानावर खोदलेल्या खड्ड्यात माती टाकली व 'मातीचा सत्याग्रह' केला. कोणत्याही परिस्थितीत रामबाग मैदानावरील नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही, या मैदानावर सिमेंट काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, झेडपी इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही, 'नाही म्हणजे नाही', असा संकल्प यावेळी आंदोलनात सहभागी नागरिकांनी केला.
झेडपीच्या नविन इमारतीमुळे भविष्यात या मैदानाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. गेल्या चार-पाच दशकापासून नागरिक या मैदानाचा सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी वापर करीत आहेत. सिंधी व ताडाच्या वृक्षांनी या मैदानाच्या सौंदर्यात विशेष भर टाकली. मैदानाशी अनेक नागरिकांच्या भावना जुळलेल्या असल्याने कोणत्याही परिस्थितीत या मैदानावर इमारतीचे बांधकाम करू नये अशी स्थानिक नागरिक व खेळाडूंची जनभावना आहे.
बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने मैदानावर खड्डा खोदल्यानंतर नागरिक संतप्त झाले व त्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. जोपर्यंत झेडपीची इमारत इतरत्र स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आमचा विरोध सुरू राहील अशी भूमिका रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने घेतली आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता मुकेश टांगळे यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला पप्पू देशमुख,भरत गुप्ता व रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे इतर अनेक सदस्य उपस्थित होते. मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.
जिप प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत आहे
नविन इमारत बांधण्याकरिता इतर ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असतांना प्रदूषित शहरातील सौंदर्याने नटलेल्या एका निसर्गरम्य क्रीडांगणावर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्याचे नियोजन करणे योग्य नाही. या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन जनतेची दिशाभूल करीत आहे. उद्या दिनांक 9 मे रोजी पुराव्यानिशी जिल्हा परिषद प्रशासनाचा पर्दाफाश करणार अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
0 comments:
Post a Comment