राजुरा,११ एप्रिल :-
राजुरा तालुक्यातील विहिरगाव नाका परिसरात रेल्वेच्या धडकेत एका मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना (दि. ११ एप्रिल २०२६) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वन्यजीव संरक्षणाबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.Leopard killedLeopard killed after being struck by a train; incident reported in the Chanakha area of Rajura taluka.
प्राप्त माहितीनुसार, सुमारे दीड वर्ष वयाच्या मादी बिबट्याचा मृतदेह दक्षिण मध्य रेल्वेच्या मार्गालगत आढळून आला. सकाळी सुमारे ८.४० वाजताच्या सुमारास ही घटना निदर्शनास आली. संबंधित परिसर हा राजुरा वनपरिक्षेत्रातील विहिरगाव उपक्षेत्र व चनाखा नियतक्षेत्रात येतो. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एन. पी. तेलंगे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले असून अहवाल प्रतीक्षेत आहे.
दरम्यान, या भागातून जाणारा रेल्वेमार्ग हा वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात येत असल्याने अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही राजुरा परिसरात रेल्वेच्या धडकेत वाघ व बिबट्यांचे मृत्यू झालेले आहेत, त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिक व पर्यावरणप्रेमींनी , नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने वारंवार केली आहे. वनविभागाकडून पुढील तपास सुरू असून, संबंधित रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उपाययोजना करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
रेल्वे प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करीत वारंवार वन्यजीवांचा होणारा रेल्वे अपघातातील दुर्दैवी मृत्यू बघता आतातरी योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे मत बादल बेले महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांनी व्यक्त केले आहे. नुकत्याच झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमदार देवराव भोंगळे, उप वनसंरक्षक योगेश वाघाये, विभागीय वन अधिकारी मंगेश गिरडकर, वन परिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे यांच्या समोर बादल बेले यांनी याच रेल्वे मार्गावर वारंवार वाघ, बिबट्या, हरिण व अन्य वन्यप्राणी अपघातात मृत्यूमुखी पडत असून यावर तात्काळ योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या याबाबत चर्चा केली होती हे विशेष.
0 comments:
Post a Comment