राजुरा,२८ एप्रिल :-
गोंडवाना विद्यापीठांतर्गत परीक्षा केंद्र क्रमांक ३२३, शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथे सुरू असलेल्या उन्हाळी २०२६ परीक्षेदरम्यान गंभीर गैरसोयी व गैरप्रकार घडत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.राजुरा परीक्षा केंद्रातील गैरव्यवस्थेवर विद्यार्थ्यांची तीव्र नाराजी; चौकशीची मागणी.Students Express Strong Dissatisfaction Over Mismanagement at Rajura Examination Center; Demand Inquiry.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, चिंचोली (खुर्द) येथील विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देत आहेत. दि. २८ एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात बी.एस्सी. सेमिस्टर ६ चा पेपर सुरू असताना परीक्षा कक्षात मूलभूत सुविधांचा अभाव प्रकर्षाने जाणवला. तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वर्गातील पंखे बंद अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांना उकाड्याचा तीव्र त्रास सहन करावा लागला. तसेच पिण्याच्या पाण्याची कोणतीही समर्पक व्यवस्था नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. याचबरोबर, काही कक्षांमध्ये कॉपीप्रकरणे सुरू असल्याच्या चर्चा असून, काही विद्यार्थ्यांनी स्वतः अशा हालचाली पाहिल्याचा दावा केला आहे. या प्रकारामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांमध्ये असंतोष व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण घटना केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नोंद झालेली आहे. त्यामुळे संबंधित फुटेजची पाहणी करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुढील परीक्षांसाठी केंद्रावर सुरक्षित, सुव्यवस्थित व सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचीही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या संदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षा संचालक, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना लेखी निवेदन सादर केले असून, तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
गैरव्यवस्थेच्या तक्रारीवर महाविद्यालयाचा खुलासा
दरम्यान, या सर्व आरोपांना महाविद्यालय प्रशासनाने स्पष्टपणे नकार दिला आहे. प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड व परीक्षा केंद्र प्रमुख डॉ. आर. एस. मुद्दमवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रावर सर्व आवश्यक सुविधा—पंखे, वीज व थंड पाण्याची व्यवस्था—उपलब्ध असून परीक्षा सुरळीत सुरू आहे. काही विद्यार्थ्यांना गैरप्रकार (कॉपी) करण्यास वाव न मिळाल्यामुळेच खोटी तक्रार करून महाविद्यालयाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तसेच, संपूर्ण परीक्षा प्रक्रियेचे CCTV चित्रीकरण उपलब्ध असून, वस्तुस्थिती पडताळून पाहता येईल, असेही प्रशासनाने नमूद केले आहे. भविष्यात अशा प्रकारे खोटी तक्रार करून बदनामी केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई व मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे परीक्षेतील व्यवस्था व पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले असून, आता विद्यापीठ प्रशासनाकडून निष्पक्ष चौकशी होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 comments:
Post a Comment