जावेद शेख / भद्रावती :- चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन माजरी हद्दीत अवैध गोवंश तस्करीविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत ५३ गोवंशीय जनावरांची सुटका केली असून तब्बल २२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
दि. १२ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास माजरी पोलीस स्टेशनचे सफौ रमेश तुराणकर व पोअं उमेश उईके हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की नागपूरकडून एक कंटेनरद्वारे जनावरांची अवैध वाहतूक सुरू आहे. माहितीची खातरजमा करून पोलिसांनी वरोरा–वणी महामार्गावरील कुचना येथे नाकाबंदी केली.
यावेळी संशयित कंटेनर (क्रमांक DD03-R-9840) थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता यू-टर्न घेत पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून कंटेनर अडवला; मात्र चालक वाहन सोडून पसार झाला.
वाहनाची तपासणी केली असता आतमध्ये ५३ गोवंशीय जनावरे (बैल, गायी, गोरे) अमानुष पद्धतीने कोंबून कत्तलीसाठी नेली जात असल्याचे उघड झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० तसेच महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ (सुधारित २०१५) आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या कारवाईत सुमारे ७.९५ लाख रुपये किमतीची जनावरे व १५ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण २२.९५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक श्री अमित पांडेय यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोउपनि हरीदास चोपने, सफौ रमेश तुराणकर, पोअं ज्ञानेश कोटरंगे, रविंद्र किन्नाके, उमेश उईके व दिलीप मंडल यांनी सक्रिय सहभाग घेतला.
👉 माजरी पोलिसांची ही कारवाई तस्करांना मोठा इशारा ठरली असून अवैध कृत्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जातील, असा संदेश दिला आहे.
0 comments:
Post a Comment