चंद्रपूर, दि. ८ मे : चंद्रपूर–नागपूर मार्गावर चिचपल्लीजवळ आज सायंकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) धावत्या बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. MH49 BZ 4187 क्रमांकाची, चिरोली–मुल–सावली–चंद्रपूर मार्गावरील बस असल्याची माहिती समोर आली असून, या बसमधील ४३ प्रवाशांचे सुदैवाने जीव वाचले.The Burning Bus
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बस धावत असतानाच इंजिनच्या भागातून धूर निघू लागला आणि काही क्षणातच आगीने पेट घेतला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चालक व वाहक यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत बस थांबवून सर्व प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र आगीत बसचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर एसटी बसच्या देखभाल व दुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नादुरुस्त बसेसबाबत येणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, संबंधित विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नसून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
0 comments:
Post a Comment