(प्रशांत गेडाम) सिंदेवाही --आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे २२ मे रोजी वाघाच्या हल्ल्यात मृत झालेल्या चार महिलांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
२२ मे रोजी सकाळी तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या कवडाबाई मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, संगीता चौधरी आणि सुनीता मोहुर्ले या चार महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. याचा कुटुंबीयांच्या सदस्यांची पालकमंत्री डॉ. उईके यांनी गुरुवारी भेट घेतली. राज्य शासन परिवाराच्या पाठीशी आहे. या परिवारातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी आपण बोलू तसेच या कुटुंबातील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारीसुद्धा सरकार घेईल, यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. वनविभागाने या परिसरात गस्त
वाढवून जंगली प्राण्यांबाबत अलर्ट द्यावा, जेणेकरून नागरिकांना सतर्क राहता येईल व त्यांचा जीव जाणार नाही तसेच वनविभागाने जंगलालगतच्या गावात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असा निर्देश डॉ. उईके यांनी दिला. यावेळी माजी आमदार अतुल देशकर, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम, उपवनसंरक्षक कुमारस्वामी , सिंदेवाही नायब तहसीलदार मंगेश तुमराम व आदी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment