जावेद शेख ।भद्रावती प्रतिनिधी:-
भद्रावती तालुक्यातील पिपरी गावातील रेती घाट हा आता फक्त घाट राहिलेला नसून, तो जणू "श्रीमंती निर्माण करणारा औद्योगिक प्रकल्प" बनल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. कारण काही वर्षांपूर्वी सायकलवर फिरणारे आता नव्या कोऱ्या ट्रॅक्टरवर दिसत आहेत, तर काहींच्या अंगणात महागड्या चारचाकी वाहनांची रांग लागल्याचे बोलले जात आहे.“Pipri’s sand or Aladdin’s magic lamp?; A highway to overnight riches!”
विशेष म्हणजे, अधिकृतरीत्या घाट बंद असल्याचे सांगितले जाते. मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार रात्री होताच घाटाला जणू नवसंजीवनी मिळते. दिवसभर शांत दिसणारे रस्ते रात्री अचानक रेती एक्सप्रेसच्या वर्दळीने गजबजून जातात. काही जण तर गंमतीने म्हणतात, "पिपरीत सूर्यास्तानंतर रेतीचे पीक उगवते आणि सूर्योदयापूर्वी कापणीही होते!"
परिसरात अशीही चर्चा आहे की, रेती वाहतुकीसाठी "फिल्डिंग" इतकी मजबूत असते की क्रिकेट सामन्यातही एवढी नसावी. कोणत्या रस्त्यावर कोण उभा राहणार, कोण लक्ष ठेवणार आणि कोण माहिती देणार याचे जणू संपूर्ण व्यवस्थापनच असते. त्यामुळे काहींनी या व्यवस्थेला "पिपरी प्रीमियर लीग (PPL)" असे नाव दिल्याची कुजबुज आहे.
रेतीचा व्यवसाय एवढा फायदेशीर ठरत आहे की नवीन ट्रॅक्टर, नवीन चारचाकी आणि वाढती आर्थिक समृद्धी पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की, "ही रेती आहे की शेअर बाजार?"
दरम्यान, घाट बंद असल्याचे सांगितले जात असले तरी रात्री सुरू असलेल्या कथित रेती वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे काही नागरिक मिश्किलपणे म्हणतात, "दिवसा घाट बंद असतो, पण रात्री तो 'नाईट शिफ्ट'मध्ये सुरू होतो!"
पिपरीची रेती आता केवळ बांधकामासाठी वापरली जात नसून, ती जणू श्रीमंतीचे नवे सूत्र ठरत असल्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. मात्र या सर्व घडामोडींकडे संबंधित यंत्रणा कधी लक्ष देणार, हा प्रश्न अजूनही कायम आहे.
"पिपरीची रेती की कुबेराचा खजिना?; रातोरात ट्रॅक्टर, फोर व्हीलर आणि श्रीमंतीचा गॅरंटी
0 comments:
Post a Comment