चंद्रपूर : महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या (CSTPS) अखत्यारितील रिजेक्ट कोल गेट ते आवंठा डॅम या मार्गाची फ्लाय अॅश वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे अक्षरशः दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने या मार्गालगत शेती असलेल्या २५ ते ३० शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, शेतीच्या कामांवरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे.Ash transport destroys road; Farmers angry!
फ्लाय अॅशच्या टँकर-कॅप्सूलसह अवजड वाहनांची सातत्याने वाहतूक होत असल्याने रस्ता उखडला आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने शेतकऱ्यांना ये-जा करताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. खराब रस्त्यामुळे शेतीची कामे करण्यास अडथळे निर्माण होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील तीन वर्षांपासून CSTPS प्रशासनाकडे सातत्याने निवेदने व स्मरणपत्रे देण्यात आली, मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“एकीकडे राज्य शासन संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे, तर दुसरीकडे शासनाच्याच अखत्यारितील यंत्रणेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असेल, तर ही बाब गंभीर आणि संतापजनक आहे,” असा सवाल युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी उपस्थित केला.
३० दिवसांत रस्ता दुरुस्त करा, अन्यथा आंदोलन!
CSTPS प्रशासनाने या रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवावेत व रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. येत्या ३० दिवसांत रस्ता दुरुस्तीबाबत ठोस कार्यवाही न झाल्यास शेतकऱ्यांना सोबत घेऊन बैलगाडी मोर्चासह तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच रस्ताबंद आंदोलन करून फ्लाय अॅश वाहतूक रोखण्यात येईल, असा स्पष्ट इशारा विक्रांत सहारे यांनी दिला आहे.
या आंदोलनातून CSTPS प्रशासनाची शेतकरीविरोधी भूमिका जनतेसमोर आणली जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अशोक उईके, खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार किशोरभाऊ जोरगेवार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच पोलीस स्टेशन पडोली यांना देण्यात आल्या आहे
0 comments:
Post a Comment