वरोरा प्रतिनिधी :- कोळसा भरलेल्या ट्रकची शहरातून होणारी वाहतूक बंद करण्याच्या मागणी करिता अनेकदा आंदोलने झाली. नगर परिषदने तसा ठराव घेतला.परंतु याला नजुमाणता बिनबोभाटपणे वाहतूक केली जात असल्याने आज मंगळवार दि १८ जानेवारी रोजी त्रस्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून कोळसा भरलेले ट्रक अडविले. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनानंतर जड वाहतूक बंद करून कोळसा भरलेले आठ ट्रक पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.
वरोरा तालुक्यातील एकोना कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाची वाहतूक वरोरा शहरातून सुरू आहे. कोळसा वाहतूक होणाऱ्या रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शहरातील रस्ते सुद्धा खराब होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी ही वाहतूक बंद करण्याची वारंवार मागणी केल्यानंतर २०१८ मध्ये नगरपरिषदेने ठराव घेऊन वाहतूक बंद केली होती. परंतु यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या परवानगीनुसार ती वाहतूक सुरू झाली. दरम्यान अनेक वेळा नागरिकांनी आंदोलन करून कोळसा भरलेल्या ट्रकची जड वाहतूक बंद पाडली.अशा आंदोलनानंतर काही दिवस जड वाहतूक बंद केली जात होती व नंतर नव्या जोमाने पुन्हा ती सुरू होण्याचे प्रकार सुरू झाले. मागील काही दिवसांपासून या रस्त्यावरून कोळसा भरलेल्या ट्रकची रात्रीच्या वेळी वाहतूक सुरू असल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. तसेच या मार्गावर छोटे-मोठे अपघात नित्याचे झाले आहे. कोळसा वाहतुकीमुळे रोड लगत राहणारे नागरिक प्रदूषण आणि रात्रीला होणाऱ्या वाहतुकीमुळे झोपमोड होत असल्याने त्रस्त झाले आहे.
यामुळे आज मंगळवार दिनांक १८ जानेवारी रोजी कासंम पंजा वार्डातील महिला-पुरुष रस्त्यावर उतरले व त्यांनी कोळसा भरलेल्या ट्रकची वाहतूक अडवून धरली. शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात कोळसा भरलेल्या वाहनांची शहरातून होणारी वाहतूक कायमची बंद करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली. अचानक झालेल्या आंदोलनामुळे वरोरा माढेळी मार्गावरील वाहतूक सुमारे पाच तास ठप्प होती.
ही माहिती प्रशासनाला मिळताच नायब तहसीलदार काळे व पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आणि नागरिकांशी सवांद साधून कोळसा भरलेले ट्रक सोडण्याचा प्रयत्न केला. परंतु मुकेश जीवतोडे यांनी याला विरोध दर्शवला. यानंतर येत्या तीन दिवसात उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या कार्यालयात ट्रक वाहतूक संदर्भात बैठक लावून तोडगा काढला जाईल असे आश्वासन नायब तहसीलदार काळे यांनी दिले. तसेच तोडगा निघेपर्यंत
सदर वाहतूक बंद राहील असा विश्वास काळे यांनी आंदोलन कर्त्यांना दिले. परंतु कोळसा भरलेले ट्रक वाहतूक करणाऱ्या चालकांकडे कोळसा वाहतूक करण्याचे कोणतेही कागदपत्र मिळून आले नसल्याने मुकेश जीवतोडे यांनी कोळसा घोटाळ्याची शक्यता वर्तवून पोलीस चौकशीची मागणी यावेळी केली. तेव्हा कोळसा भरलेले आठ ट्रक पोलिस स्टेशनला जमा करण्यात आले. यावेळी नगरसेवक दिनेश यादव,शिवसेना शहरप्रमुख संदीप मेश्राम,अतुल नांदे अनिल गाडगे,अमझल खान,दिलीप उमाटे, शाबीर शेख,सलीम शेख,आकाश पिंगे यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment