चंद्रपुर :-Operation Sindoor ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी "नॅशनल सिक्युरिटीसाठी नागरिक" या उपक्रमांतर्गत पाच किलोमीटर लांब तिरंगा रॅली काढून चंद्रपूरकरांनी भारतीय सैन्याच्या शौर्याला आणि बलिदानाला भव्य सलामी दिली. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून पार पडलेल्या या ऐतिहासिक उपक्रमाला हजारो नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. यात विविध धर्मीय धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे विविधतेत एकतेचे दर्शन घडले.
Chandrapur residents salute the bravery of the Indian Army by taking out a 5-kilometer long tricolor rally
संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर सदर रॅली जय घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्थ झाली. या रॅलीत शहरातील विविध भागांतून तरुण, विद्यार्थी, महिलावर्ग, सामाजिक संस्था, व्यापारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. विशाल तिरंगा खांद्यावर घेऊन चालताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान, देशप्रेम आणि एकतेचा झळाळता प्रकाश दिसत होता.
या रॅलीत विविध धर्मगुरूंच्या उपस्थितीमुळे विविधतेत एकता हा भारतीय संस्कृतीचा मूलमंत्र प्रत्यक्ष साकार झाला. हिंदू, मुस्लिम, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, जैन बांधवांनी एकत्र येऊन देशाच्या एकतेचा संदेश दिला. या प्रसंगी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, भारतीय जवानांच्या बलिदानामुळे आपण शांततेत जगतो. त्यांच्या सन्मानार्थ आपण कृतज्ञतेने झुकतो. ही रॅली केवळ एक कार्यक्रम नसून चंद्रपूर शहराची राष्ट्रभक्तीची आणि एकतेची ताकद जगाला दाखवणारा संदेश आहे.
कार्यक्रमात भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान अशा घोषणा देत वातावरण देशभक्तीने भारावले होते. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला, विद्यार्थ्यांनी फलक आणि बॅनरद्वारे देशप्रेमाचे संदेश दिले, तर काही ठिकाणी बॅण्ड पथकाच्या गजरात रॅलीचे स्वागत करण्यात आले. रॅली जटपूरा गेटला वळसा घालून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीच्या मार्गावर विविध सामाजिक संघटना, व्यापारी वर्गाच्या वतीने पाणी, शीतपेय, फळांचे वाटप करत आपला सहभाग नोंदविला. या रॅलीत जवळपास २०० सामाजिक संघटना आणि पाच हजार देशभक्त नागरिक सहभागी झाले होते.
0 comments:
Post a Comment