चंद्रपूर : सामान्य माणसाचे प्रश्न लालफितीत अडकलेले असतात. शासकीय दप्तरात जाऊन सामान्य माणसाचे प्रश्न सोडले जात नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या हेतूने खासदार बाळू धानोरकर यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते. यावेळी शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. यात शेकडो नागरिकांच्या समस्यांचे निराकरण झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू दिसून येत होते.
यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, माजी कुलगुरू विजय आईंचवार,चंद्रपूर मध्यवर्ती बँक माजी अध्यक्ष बाबासाहेब वासाडे, शिक्षण संस्था संचालक पांडुरंगजी आंबटकर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल शेख, कामगार नेते के. के. सिंग, इन्स्पायर चे संचालक प्रा. विजय बदखल, ग्रामीण तालुका अध्यक्ष शामकांत थेरे, इंटक युवा नेते प्रशांत भारती, राज यादव यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रामुख्याने सामान्य नागरिकांना महाऔष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांवरील, वेकोलि क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांवरील होणार अन्याय, आदिवासी वसतिगृहातील प्रवेशांत झालेला घोळ, पेन्शन ग्रस्त नागरिकांचे प्रश्न लोकसभेत मांडणे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाजाच्या शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात तसेच संस्था चालकांचा खात्यात जमा करणे, एसटी बस सेवा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे, तृतीयपंथी समाजाच्या समस्या, ग्रामीण भागात रस्ते बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून देणे, यासह अन्य मागण्या यावेळी उपस्थित करण्यात आल्या. त्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून तात्काळ निपटारा करण्याची विनंती, यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी केली. यावेळी जनता दरबारात शेकडो प्रश्न मार्गी लागले. पुढे देखील जनता दरबाराच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावून सामान्य जनतेला न्याय देण्यास कटिबद्ध असल्याचे यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले.
0 comments:
Post a Comment