भद्रावती तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील चेक बरांज गावाची पुनर्वसनाची प्रक्रिया मागील कित्येक वर्षापासून रखडलेली आहे. चेक बरांज व परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिक पुनर्वसन व ईतर मागण्यांसाठी सरकारसह कारखान्याला सतत विनंती करीत आहेत. मात्र चेक बरांज व परिसरातील नागरिकांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे चेक बरांज गावाचे तीस दिवसांचे आत पुनर्वसन न झाल्यास आत्मदहन करत कंपनी बंद पाडण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य गिरजा पानघाटे यांच्यासह सखुबाई कुळसंगे, जीजा मरसकोल्हे, आशा मेश्राम व ईतर महिलांनी भद्रावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
सन २००८ मध्ये भद्रावती तालुक्यातील चेक बरांज येथे कर्नाटका एम्टा Karnataka EMTA at Check Baranj या कंपनीचे मार्फत कोळसा उत्खननाचे कामकाज सुरू करण्यात आले होते. मात्र मागील १५ वर्षांच्या कार्यकाळात गावकरी, शेतकरी तसेच प्रकल्पग्रस्त नागरिकांना विविध प्रकारचा त्रास सोसावा लागत आहे. गावाचे पुनर्वसन, बेरोजगारी, प्रदुषण व ईतर अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. संबंधित कारखान्याने गावकऱ्यांच्या जागेवर प्रकल्प उभारून व कोळसा उत्खनन करून हजारो कोटी रुपयांचे उत्पन्न कमावले आहे. परंतु स्थानिक रहिवाशांना या प्रकल्पाचा काहीच उपयोग झाला नाही. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्या जमिनी कवडीमोल भावात खरेदी करून त्यांच्या जन्मोजन्मीच्या उपजीविकेच्या साधनावर कंपनीने कब्जा केला. अनेकांचे राहते घरही प्रकल्पात गेले. या प्रकल्पग्रस्त नागरिकांना कोणतीही सुरक्षा प्रधान केली नाही तसेच अनेकांना मोबदलाही मिळाला नाही. त्यामुळे चेक बरांज येथील नागरिक मागील पंधरा वर्षांपासून जीव मुठीत धरून राहत असून नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे.
कंपनीने केलेल्या करारानुसार नागरिकांचे पुनर्वसन करण्यात यावे. भूगर्भातून कोळसा काढण्यासाठी वेळी अवेळी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंग मुळे जमिनीला मोठमोठे हादरे बसत असून घरातील भिंतींना भेगा पडलेल्या आहेत. सततच्या ब्लास्टिंग मुळे वारंवार घरातील भांडी पडत असतात. या घटनांमुळे कोणत्याही क्षणी राहते घर अंगावर पडून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोबतच प्रदूषित धुळीचे कण सतत वातावरणात पसरत असल्यामुळे बरांज (मो.) व चेक बरांज येथील अनेकांना श्वासनाचा त्रास सुरू झाला आहे.
चेक बरांज येथील ग्रामपंचायत सदस्य गिरजा पानघाटे यांच्यामार्फत याआधीही विविध शासकीय अधिकाऱ्यांना तसेच कर्नाटका एम्टा येथील अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करत समस्या सोडविण्यासंबंधी विनंती करण्यात आलेली आहे. मात्र आजपर्यंत कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे दि.९ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पुनर्वसन तसेच इतर समस्या सोडविण्यासंबंधी विनंती करण्यात आली असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावात कोणतीही जीवितहानी झाल्यास शासकीय अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन यावर काय भुमिका घेईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 comments:
Post a Comment