जावेद शेख /भद्रावती : नगरपरिषदेने मुख्य बाजाराच्या ठिकाणी ० ते ३० किलोग्रॅम वजनाचा वजन काटा लावण्यात यावा यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावतीच्या वतीने सोमवारी निवेदन देण्यात आले.
To prevent consumer fraud, set up a weighing scale in the market.
ग्राहकांना बाजारात अनेकदा वस्तू, धान्य, किराणा, भाजीपाला विकत घेतल्यानंतर दुकानदाराने वजन बरोबर न दिल्याच्या अनेक तक्रारी पाहायला मिळतात. परंतु वजन कमी मिळाले हे माहीत असून सुद्धा ग्राहकाला याविषयी काही करता येत नाही. त्यामुळे बरेचदा ग्राहकांची फसवणूक होते.
याविषयाची गंभीर दखल घेत “ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती” च्या वतीने नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांना भद्रावती शहरातील बाजाराच्या मध्यभागी ० ते ३० किलोग्रॅम वजनाचा इलेक्ट्रॉनिक वजन काटा लावण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी लवकरच ठराव घेऊन बाजारात वजनकाटा लावण्यात येईल असे आश्वासन नगराध्यक्ष यांनी दिले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने ग्राहकांच्या हितासाठी योग्य विषय मांडला याबद्दल नगराध्यक्ष आणि उपमुख्याधिकारी यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या भद्रावती शाखेचे कौतुक केले.
वस्तू विकत घेतल्यानंतर वजन कमी मिळाल्याची शंका आल्यास ग्राहकाला नगरपरिषदेने लावलेल्या वजन काट्यावर जाऊन खात्री करता येईल. तसेच वजन कमी दिले असल्यास अशा दुकानदारांची तक्रार ग्राहक पंचायत महाराष्ट्र किंवा वैद्य मापन शास्त्र विभागाकडे ग्राहकाला करता येईल. यामुळे बाजारात दुकानदारांकडून फसवणुकीचे प्रमाण कमी होऊन ग्राहकाला न्याय मिळेल असे यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर यांनी सांगितले.
यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, सचिव वतन लोने, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव करुणा मोघे, सदस्य सोनल वावरे, विनोद ठमके, गुरुदेव बावणे, प्रतिक्षा बनकर उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment