भद्रावती, प्रतिनिधी जावेद शेख :-
भद्रावती शहरातील मुख्य बाजारपेठ व हनुमान नगर रोड (जुने वडाचे झाड परिसर) येथे गर्दीच्या वेळेत जड वाहनांना बंदी घालण्याचा आदेश तहसीलदार कार्यालयातून जारी करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. आदेशानंतरही बाजारपेठ परिसरात हायवा, दहा चाकी ट्रक तसेच २२ चाकी डबल हाउजिंग ट्रेलर सहजपणे ये-जा करत असल्याचे चित्र समोर आले आहे.
दरम्यान भद्रावतीची मुख्य बाजारपेठ ही शहरातील अत्यंत वर्दळीची जागा असून सकाळी शालेय विद्यार्थ्यांची तर सायंकाळी महिला, दुकानदार आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी जड वाहनांची ये-जा सुरू राहिल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच तहसीलदार कार्यालयाने गर्दीच्या वेळेत जड वाहनांना प्रवेशबंदी घालण्याचा आदेश काढला आहे. विशेष म्हणजे तहसीलदार हे तालुक्याचे दंडाधिकारी (Executive Magistrate) असल्याने सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात आदेश देण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो. त्यामुळे या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात बाजारपेठ परिसरात जड वाहने सुरूच असल्याने आदेशाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
या संदर्भात भाजयुमो प्रदेश सचिव तथा जनसेवक इम्रान अफजल रफीक खान यांनी पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला असता पोलिसांनी सांगितले की जड वाहतुकीची वेळ निश्चित करणे व त्याबाबत ठराव घेणे हे नगरपालिकेच्या अखत्यारीतील काम आहे. वाहतूक नियंत्रणाची अंमलबजावणी करता येऊ शकते; मात्र जड वाहनांच्या प्रवेशासंबंधीचा निर्णय नगरपरिषदेने घ्यावा लागतो, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
दरम्यान, इम्रान खान यांनी नगरपरिषद कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता जड वाहतुकीबाबत कोणतेही अधिकृत पत्र नगरपरिषदेला प्राप्त झालेले नाही, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे या आदेशाची माहितीच नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय एकीकडे पोलिस प्रशासन हा विषय नगरपालिकेच्या अखत्यारीतील असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे नगरपरिषदेला आदेशाचे पत्रच मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तहसीलदारांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी नेमकी कोण करणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
यानंतरही समोर आलेल्या छायाचित्रात भद्रावती नगर परिषद कार्यालयासमोरूनच २२ चाकी डबल हाउजिंग ट्रेलर जाताना दिसत आहे. जड वाहतूक बंदीचा आदेश असतानाही शहराच्या मध्यवर्ती भागातून एवढ्या मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असल्याने प्रशासनातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात इम्रान अफजल रफीक खान म्हणाले, “नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न
अत्यंत महत्त्वाचा आहे.आदेश काढल्यानंतर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. संबंधित विभागांनी समन्वय साधून
तातडीने कारवाई करावी.”
तसेच मुख्य बाजारपेठेत जड वाहतूक नियंत्रणात येईपर्यंत हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या भद्रावतीकरांच्या मनात एकच प्रश्न आहे .जड वाहतुकीवरील बंदी आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार?
0 comments:
Post a Comment