नागभीड (सुभाष माहोरे):
नागभीड तालुक्यातील मोहळी ते कानपा मार्गावर Regional Transport Office (RTO) पथकाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दिनांक १७ मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजल्यापासून या मार्गावर RTO चे ५ ते ६ कर्मचारी तैनात होते.
या पथकाकडून प्रामुख्याने दुचाकीस्वार, लहान मालवाहू वाहने, टेम्पो तसेच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात येत असल्याचे दिसून आले. लायसन्स, हेल्मेट, सीटबेल्ट, PUC अशा कारणांवरून वाहनधारकांना थांबवून दंडाची कारवाई केली जात होती.
मात्र, याच मार्गावरून अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि रेती-गिट्टीने ओव्हरलोड भरलेले मोठे हायवा ट्रक भरधाव वेगाने जात असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ट्रकवर पासिंगपेक्षा जास्त उंचीने डाले वाढवून ओव्हरलोड वाहतूक सर्रास सुरू असल्याचेही निदर्शनास आले.
या ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागभीड ते कानपा मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून लहान वाहनधारकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. तरीही संबंधित यंत्रणेकडून मोठ्या वाहनांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“चोर सोडून संन्याशाला फाशी” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली असून RTO कारवाईच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. काहींनी तर या प्रकरणात अवैध वाहतूक करणाऱ्यांशी संगनमत असल्याचा संशयही व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित Maharashtra Transport Department व Maharashtra Police यांनी या प्रकाराची चौकशी करून ओव्हरलोड व अवैध वाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच रस्ते सुरक्षेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0 comments:
Post a Comment